साहित्य परिषदेचा डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार डॉ. रमेश वरखेडे यांना प्रदान
पुणे : केवळ व्याकरणाचा आग्रह धरून चालणार नाही. भाषेतून समाज वाचता आला पाहिजे असे मत ज्येष्ठ भाषा अभ्यासक, लेखक व समीक्षक डॉ. रमेश वरखेडे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणारा डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार ज्येष्ठ भाषा अभ्यासक, लेखक व समीक्षक डॉ. रमेश वरखेडे यांना महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. दहा हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, कार्यवाह अंजली कुलकर्णी, पराग जोगळेकर, उज्ज्वला जोगळेकर यावेळी उपस्थित होते.
डॉ. मोरे म्हणाले, अभ्यास करणारी माणसे संस्थात्मक काम करत नाहीत पण डॉ. जोगळेकर यांनी अभ्यासाबरोबरच संस्थात्मक काम मनोभावे केले आणि तेच काम डॉ. वरखेडे करत आहेत.
प्रा. जोशी म्हणाले, एक काळ असा होता की प्राध्यापकांच्या नवे शिक्षण संस्था आणि विद्यापीठे ओळखली जात होती. आज ते वैभव उरले नाही. समाजात भौतिक समृद्धी येत असताना वाढणारे वैचारिक दारिद्र्य हा चिंतेचा विषय आहे. डॉ. जोगळेकर यांनी संस्थात्मक कार्याचा आदर्श वस्तुपाठ निर्माण केला.
सुनिताराजे पवार यांनी प्रास्ताविक केले. अंजली कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
फोटो ओळ : डॉ. उज्ज्वला जोगळेकर, पराग जोगळेकर, प्रा. मिलिंद जोशी, डॉ. रमेश वरखेडे, डॉ. सदानंद मोरे, सुनिताराजे पवार, अंजली कुलकर्णी
