साहित्य परिषदेविषयी

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे ही महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था आहे. गेली ११९ वर्षे ही संस्था मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी कार्यरत आहे. हा मुळीचा झरा अनेक सारस्वतांसाठी अक्षय ऊर्जाकेंद्र आहे.

ऐतिहासिक वास्तूला धक्का न लावता अंतर्गत देखणे सुशोभीकरण –
 
          २०२१ साली कोरोनाच्या संकटात वार्षिक सर्वसाधारण सभेने घटनेतील तरतुदीनुसारच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विद्यमान कार्यकारी मंडळाला या मंडळाने परिषदेला साहित्याभिमुख आणि लोकाभिमुख करण्यासाठी केलेले काम पाहून पाच वर्षांची मुदतवाढ दिली. साहित्य परिषदेच्या आजवरच्या वाटचालीतील ही ऐतिहासिक घटना आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेने व्यक्त केलेला हा विश्वास सार्थ ठरवत कार्यकारी मंडळाने साहित्य परिषदेच्या अंतर्गत नूतनीकरणाचा महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेतला आणि तो पूर्णत्वाला नेऊन साहित्यिकांचे आणि साहित्यरसिकांचे कित्येक दशकांचे स्वप्न पूर्ण केले. परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, कार्यकारी विश्वस्त डॉ. पी. डी. पाटील, विश्वस्त यशवंतराव गडाख यांनी केलेल्या भरघोस अर्थसाहाय्यामुळे हा प्रकल्प पूर्ण झाला. परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहाच्या नूतनीकरणामुळे या सभागृहात येणाऱ्या साहित्य रसिकांना आता सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. या सभागृहातली आसन व्यवस्था आरामदायी झाली आहे. हे सभागृह वातानुकूलित आणि ध्वनिदोषविरहीत करण्यात आले आहे. आसनक्षमता वाढली आहे.
   

      आजवर झालेल्या साहित्य संमेलनाच्या सर्व अध्यक्षांची छायाचित्रे नव्या रूपात सभागृहात लावण्यात आलेली आहेत. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित सारस्वतांचे सभागृहात खास दालन करण्यात आले आहे. परिषदेच्या कार्यालयानेही कात टाकली आहे. प्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल यांनी दिलेल्या देणगीतून पहिल्या मजल्यावर सर्व सोयींनीयुक्त कोहिनूर बैठक कक्ष करण्यात आला आहे. स्थानिक कार्यवाहांना बसण्यासाठी स्वतंत्र कार्यवाह कक्ष तयार करण्यात आला आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कृष्णसुंदर गोयल फाउंडेशन पुरस्कृत कोहिनूर सभागृह
दुबईस्थित प्रसिद्ध उद्योगपती विनोद जाधव यांनी त्यांचे वडील कल्याणराव जाधव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ परिषदेच्या वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयाचे नूतनीकरण करून दिले आहे. या ग्रंथालयात कल्याणराव जाधव अभ्यासिकेचीही निर्मिती करण्यात आली आहे. लिफ्टची सुविधा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी दिलेल्या देणगीतून उपलब्ध झाली आहे. उपाध्यक्ष राजीव बर्वे यांनी दिलेल्या देणगीतून साकारणाऱ्या द.के.बर्वे व्यासपीठावर अनेक अभिनव कार्यक्रम होतील.
 
     टेरेसवर कल्याणराव जाधव सभागृह तयार करण्यात आले असून ते सभागृहही विविध कार्यक्रमांसाठी अनेक संस्थांना उपयुक्त ठरणार आहे. परिषदेची संरक्षक भिंत आणि रंगकाम झाल्यानंतर या ऐतिहासिक वास्तूला नवी झळाळी प्राप्त होईल. बौद्धिक कामांबरोबरच परिषदेच्या भौतिक विकासाचे हे कामही महत्त्वाचे होते. या विकास कामामुळे परिषदेला भविष्यासाठी उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होणार आहेत. परिषद आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी ते महत्त्वाचे आहेत.
 
     परंपरा आणि आधुनिकतेचा मिलाफ घडवित आज साहित्य परिषदेची वाटचाल सुरू आहे. जुन्यातले नवे आणि नव्यातले अगदी नवे स्वीकारत यापुढेही परिषद समाजमनाची स्पंदने ओळखून कार्यरत राहणार आहे.
 
    आजवर आपल्यासारख्या साहित्यप्रेमींची खंबीर साथ परिषदेला मिळाली आहे, यापुढेही मिळेल याची खात्री आहे.
 
                                                                       प्रा. मिलिंद जोशी , कार्याध्यक्ष  महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे 

मराठी भाषा , साहित्य , समीक्षा आणि संस्कृती यांची जपणूक, विकास व प्रसार करणारी संस्था.

महाराष्ट्र साहित्य परिषद जन्मस्थळ मळेकर वाडा १९०६ .

११९ वर्षांची समृध्द परंपरा लाभलेल्या आणि महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था असा नावलौकिक असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माधवराव पटवर्धन सभागृह नव्या देखण्या रूपात

महाराष्ट्र साहित्य परिषद

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे आद्य प्रेरक

महाराष्ट्र साहित्य परिषद

महाराष्ट्र साहित्य परिषदेतील दुर्मिळ ग्रंथ संपदा

महाराष्ट्र साहित्य परिषद
Scroll to Top